Friday, May 4, 2012

पोलिसांनी 52 बालमजुरांची सुटका केली ( 52 labor kids got Freedom )

भायखळा (पश्‍चिम) येथील कांजरपाडा परिसरातील लेदर बॅगच्या कारखान्यांवर छापे घालून पोलिसांनी ५२ बालमजुरांची सुटका केली. या प्रकरणी १८ मालकांना अटक करण्यात आली आहे.
कांजरपाड्यात मोठय़ा प्रमाणात चालणार्‍या लेदर बॅग, पाकीट आणि रेक्झिन बॅग तसेच जरीकाम कारखान्यांमध्ये बालमजुरांकडून काम करून घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे गुन्हा अन्वेषण विभागाच्या मदतीने महापालिकेच्या ई वॉर्डातील कामगार विभाग आणि प्रथम या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तरीत्या समाजसेवा शाखेचे सहायक आयुक्त वसंत ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या बालकामगारांची सुटका केल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानदेव हिरे यांनी दिली. या धाडसत्रात १८ मालकांनाही अटक करण्यात आल्याची माहिती समाजसेवा शाखेचे सहायक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी दिली.बालहक्क अधिनियम ३ व १४ आणि कलम २३ व २६ अन्वये अटक केलेल्या कारखान्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरच त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे ढोबळे यांनी सांगितले. सुटका करण्यात आलेल्या बालमजुरांची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात येईल. 
सुटका करण्यात आलेली मुले ९ ते १४ वयोगटातील आहेत. ही सर्व मुले बहुतांशी बिहारमधील असून, गरिबीमुळे यांचे पालक त्यांना कामासाठी मुंबईत पाठवतात. कमी मोबदल्यात मिळणार्‍या या बालकामगारांना मोठी मागणी आहे. येथे कारखान्याचे मालक महिना पाचशे ते एक हजार रुपयांत यांच्याकडून काम करून घेतात, अशी माहिती एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्याने 'लोकमत'शी बोलताना दिली.

No comments:

Post a Comment